गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती ! – शिवसेनेची टीका

मुंबई प्रतिनिधी । खलीस्तान प्रकरणाला हवा देऊन देशातील असंतोष विझवण्याऐवजी तो असाच भडकलेला ठेवण्यात सरकारला रस असल्याचा आरोप करत गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती आहेत. माध्यमे व यंत्रणांवर त्यांचा कब्जा आहे. तरीही शेतकरी आंदोलन त्यांना थांबविता आले नाही व देशव्यापी बंद झाला. सरकारपुरस्कृत अराजकाला हे चोख उत्तर असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदबाबत भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, विरोधकांनी शेतकर्‍यांची बाजू घेणे म्हणजे अराजक माजविण्याचा प्रयत्न, असा नवा शोध सरकार पक्षाने लावला. बंद पुकारला आहे तो शेतकरी संघटनांनी. त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. विरोधकांनी फक्त शेतकर्‍यांना पाठिंबा दिला, यात काय चुकले? वास्तविक, भारतीय जनता पक्षाने सध्या प. बंगालात जो राजकीय गोंधळ घातला आहे, हजारो लोक रस्त्यावर उतरवून थयथयाट चालविला आहे, जातीय, धार्मिक उन्माद चालविला आहे, रक्तपात आणि हिंसाचार घडविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यालाच खरे तर अराजक हा शब्द लागू पडतो. ही एवढी ताकद शेतक़र्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लावली असती तर थंडी-वार्‍यात रस्त्यावर बसलेला शेतकरी आपापल्या घरी सुखरूप गेला असता, पण सरकारलाच अराजक हवे आहे. अराजकाच्या शेकोटीवर त्यांना राजकीय भाक़र्‍या शेकायच्या आहेत.

यात पुढे म्हटले आहे की, आंदोलनाच्या समर्थनासाठी पंजाबमधील खेळाडू, कलाकार एकवटले. त्यातले अनेक जण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत. आता हे सर्व खेळाडू अतिरेक्यांना मदत करीत आहेत, अराजक घडवीत आहेत, असे म्हणायचे का? शेतकऱयांच्या आंदोलनास चीन व पाकिस्तानची फूस तर आहेच, पण त्यांच्याकडून अर्थपुरवठाही होत असल्याची फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली. आता दिल्लीत हिंदुस्थान बंदच्या आधी पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. त्यातले तीन पंजाबचे तर दोन कश्मीरचे आहेत. यांचे संबंध खलिस्तानवाद्यांशी असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. आता गाडलेले खलिस्तानचे भूत पुन्हा उकरून काढले जात आहे. खलिस्तान हा विषय संपला आहे, पण शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आहेत असे खोटेच पसरवून भ्रम निर्माण करायचा व दिल्लीत पकडलेल्या अतिरेक्यांचा संबंध खलिस्तानशी जोडून नव्या अराजकाची वाट तयार करायची, असे कारस्थान घडताना दिसत आहे.

यात शेवटी नमूद केले आहे की, देशावर सतत भय-दहशतीची टांगती तलवार ठेवून आम्हीच तुमचे तारणहार आहोत, असा प्रचार करून राजकीय फायदा मिळवायचा. यालासुद्धा अराजकच म्हणावे लागेल. देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो असाच भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे. गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती आहेत. माध्यमे व यंत्रणांवर त्यांचा कब्जा आहे. तरीही शेतकरी आंदोलन त्यांना थांबविता आले नाही व देशव्यापी बंद झाला. सरकारपुरस्कृत अराजकाला हे चोख उत्तर आहे असा टोला यात मारण्यात आला आहे.

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

 

Protected Content