उल्हासनगरमध्ये भाजपला जबर धक्का : महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशन


उल्हासनगर (वृत्तसंस्था) उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. कारण महासेनाआघाडीच्या बळावर शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

संख्याबळ वाढवण्यासाठी ‘साई’ पक्षाला विलीन करण्याची भाजपची खेळी अयशस्वी ठरली आहे. शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे ‘साई’ पक्ष महापौरपदाच्या स्पर्धेत किंगमेकर ठरणार होता. त्यामुळे भाजपने ‘साई’ पक्षालाच आपल्यात विलीन करुन घेण्याचा ‘गेम’ खेळला. उपमहापौरपदावर असलेल्या ‘साई’ पक्षाच्या जीवन इदनानी यांना महापौरपदाची ऑफरही भाजपने दिली होती. परंतु ऐनवेळी बाजी पलटली आणि शिवसेनेच्या नगरसेविका लीलाबाई आशन महापौरपदी विराजमान झाल्या. दरम्यान,आमच्यावर भाजपने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला फरक पडत नाही. आम्ही व्हीप झुगारुन विरोधात मतदान केले. आमच्याशिवाय सत्तास्थापन करता येणार नाही, अशी भाजपची गुर्मी होती. मात्र आम्ही त्यांचा माज उतरवला आहे. आता त्यांना जे करायचे असेल ते करावे, अशी प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली आहे.

Protected Content