दिल्ली (वृत्तसंस्था) उरीनंतरचा सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हवाई हल्ल्याची अचूक व यशस्वी योजना आखून पाकिस्तानला दणका देणारे सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीर विषयातले तज्ञ मानले जाणारे अरविंद कुमार यांच्याकडे ‘आयबी’च्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या दोघांची निवड केली असून लवकरच हे आपला पदभार स्वीकारतील.
सामंत गोयल यांनी बालाकोट हवाई हल्ल्याची आखणी आणि नियोजन केले होते. तर अरविंद कुमार हे आसाम-मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी असून अनेक वर्षांपासून आयबीसाठी ते काम करत आहेत. देशातील नक्षलवादाला वेसण घालण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. ‘रॉ’ ही शत्रूराष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था आहे तर देशांतर्गत हिंसाचार, देशविरोधी कारवायांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी ‘आयबी’वर आहे.