संस्कृतीचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी संतांनी प्रबोधन करावे; संत संमेलनात एकमुखी निर्णय

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र अनिष्ट रूढी परंपरेचा अवलंब करून आपणच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करीत असल्याने या पुढील काळात संतांनी समाजासाठी प्रबोधन करावे असा एकमुखी ठराव देवगिरी प्रांत मराठवाडा व खानदेश मिळून १६ जिल्ह्यातून आलेल्या २५० संत महंतांनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांत यांच्या पुढाकाराने निसर्गरम्य अशा श्री निष्कलंक धाम वढोदा ( फैजपूर ) येथे संपन्न झालेल्या दि. २७ व २८ फेब्रुवारी या दोन दिवसीय संत संमेलनात अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे राज्याध्यक्ष परमपूज्य गोपाल चैतन्यजी महाराज, रा.स्व. संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, धर्म जागरण पश्चिम क्षेत्र प्रमुख महेंद्रजी रायचुरा, प्रांत प्रमुख श्री सिद्धेश्वरजी बिराजदार, धर्म जागरण संस्थेचे योगी दत्तानाथजी शिंदखेडा, महानुभाव पंथाचे गादीपती सुरेशशास्त्री मानेकर बाबा, श्री क्षेत्र डोंगरदे येथील स्वरूपानंदजी महाराज, प. पू. दिगंबर महाराज शिवाचार्यजी वसमत, श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी सकारात्मक समाज प्रबोधन या विषयांतर्गत चार विभागात बैठक घेऊन एकूण पाच चर्चा सत्रामध्ये विविध विषयांवर चर्चा करून त्यावर पुढील काळात संतांनी समाज प्रबोधन करावे असे ठरले.

या विषयांवर झाली चर्चा
१) धार्मिक सण उत्सवात विविध देवतांच्या मूर्तीची विटंबना, लहानांपासून मोठ्यापर्यंत डीजेच्या आवाजाने होणारे परिणाम, असंख्य प्रमाणात होत असलेली व्यसनाधीनता, फिल्मी गीतांवर अयोग्य पद्धतीने नाचणे. २) लग्नकार्य समारंभात प्री-विडिंग प्रथा तसेच समाजातील विक्षिप्तपणा थांबवण्यासाठी संतांनी समाजाचे प्रबोधन करून आपली धार्मिक संस्कृती परंपरेची जोपासना करावी. ३) सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. ४) आपापल्या परिसरातील असलेल्या मंदिरांची पवित्रता जोपासून दररोज मंदिरात जाणे. ५) पर्यावरण, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छतेसाठी संतांनी प्रबोधन करावे. ६) भगवान श्रीराम स्वतः वनवासातील शबरीमाता, केवट, निशाद यांच्यासारख्या अनेक वनवासी बांधवांकडे जाऊन त्यांना प्रेम देतात त्याच पद्धतीने संतांनी अशा समाज, जनजातीतील सर्वांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांच्या मदतीसाठी यथायोग्य प्रयत्न करावे.

या संत संमेलना देवगिरी प्रांतातील १६ जिल्ह्यांमधून संत, महंत, कथाकार, कीर्तनकार, पुजारी, प्रवचनकार, भगत यांच्यासह राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते, धर्म जागरण तथा सतपंथ परिवातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content