अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवकांना दिला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार यावर्षी अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर सुकदेव कोळी यांना प्रदान करण्यात आला. जळगाव येथे पोलीस मुख्यालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सागरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपये यांचा समावेश आहे.
सागर कोळी शिक्षण घेत असतानापासूनच समाजसेवेत सक्रिय आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनमुक्ती आणि बालविवाह निर्मूलनासाठी त्याने पथनाट्ये सादर केली आहेत. तसेच तंबाखू मुक्त अभियान आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवांमध्येही त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी त्याने केलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्याला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या गौरव सोहळ्याला जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सागरच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.