चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” या विशेष मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ चोपडा तालुक्यातील खडगाव येथे उत्साही वातावरणात पार पडला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्याने राबविण्यात येणारी ही मोहीम १ मे २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून, मोहिमेचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात गटविकास अधिकारी अनिल विसावे, पंचायत विस्तार अधिकारी जितेंद्र पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण, स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन, ग्रामपंचायत सरपंच कविता चव्हाण, उपसरपंच रविंद्र पाटील, तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गावात व कुटुंब पातळीवर ओला व सुका कचरा वेगळा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकल्यास त्याचे रूपांतर सेंद्रिय खतात होऊन शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यांनी उपस्थितांना शाश्वत स्वच्छतेची प्रतिज्ञा करत या मोहिमेला कृतीच्या पातळीवर उतरवण्याचे आवाहन केले.
स्वच्छतेचा दुसरा टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या मोहिमेमुळे गावोगावी जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन, पुनर्वापर, व पर्यावरणपूरक उपाययोजना राबविल्या जातील. ग्रामपंचायत स्तरावर याची अंमलबजावणी करून गावांना दृष्यमान स्वच्छतेचा दर्जा मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश धनगर, शिपाई बाळू भिल आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाला जिल्हास्तरावरही मोठा प्रतिसाद लाभला असून, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिरसोली येथे जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. मंत्री पाटील यांनी स्वच्छता ही केवळ शासकीय योजना नसून ती आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, असे सांगून ग्रामस्थांनी शासनाच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. त्यांनी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या स्वच्छता कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या अनुयायांचा सहभागही कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कंपोस्ट खड्ड्यातून तयार होणारे जैविक खत पर्यावरणपूरक आणि शाश्वत असल्याचे सांगून, नागरिकांनी ही शपथ केवळ कागदापुरती न ठेवता कृतीत उतरवावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे, गटविकास अधिकारी सतीश धस, सरपंच हिलाल भील, माजी सरपंच अनिल पाटील, तसेच अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेतृत्व यांचे सक्रिय योगदान या मोहिमेस मिळत आहे.