खंडित वीजपुरवठा पूर्ववत करा – वाकडी ग्रामपंचायतीची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असतांना महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याने आणखी अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीने जाहीर निषेध करत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले. 

तालुक्यात दि.२० मार्च रोजी झालेल्या अवकाळी गारपीटीमुळे वाकडी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना महावितरण कंपनीने गावातील स्ट्रीट लाईट व शेतातील विज खंडित केले आहे. त्यामुळे शेतकरी हे त्रस्त झाले आहेत. गावातील स्ट्रीट लाईटचे बिल अद्याप पावेतो जिल्हा परिषद भरणा करत होती. मात्र अचानक महावितरण कंपनीने बिल भरण्याचे तगादा धरल्याने शेतकरी वर्गाला सुचेनासे झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत स्ट्रीट लाईट संदर्भात शासकीय स्तरावर धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत विज बिल भरण्यात येणार नाही असे पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे. 

तसेच खंडित वीज पुरवठा पुर्ववत करून शेतकऱ्यांना सहकार्य करा अशा आशयाचे निवेदन वाकडी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील व सदस्य मिळून कार्यकारी अभियंता शेंगडे यांना आज देण्यात आले.  मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे निवेदन यावेळी देण्यात आले. या निवेदनाप्रसंगी कार्यकारी अभियंता शेंगडे, उपकार्यकारी अभियंता जगताप, कनिष्ठ अभियंता गुडघे, सरपंच प्रकाश पाटील व सदस्य उपस्थित होते.

Protected Content