Home धर्म-समाज पारोळ्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पारोळ्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

0
6

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पारोळा शहरात त्यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समता, बंधुता आणि न्यायपूर्ण समाज घडविण्याचा संकल्प करण्यात आला. अमळनेर चौफुली लगत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचा प्रसिद्ध विचार, “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे,” याचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेतून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि दलित घटकांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या गेल्या असून, सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी जनमानसात पोहोचविल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते नगरसेवक अमृत चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिष पाटील, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, राजूभाऊ कासार, उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, प्रतोद तथा नगरसेवक नितीन सोनार, नगरसेवक नजीरखान बेलदार, युवासेना शहरसंघटक प्रशांत पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक समता, स्वाभिमान, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजपरिवर्तनासाठी मार्गदर्शक ठरत असून, नवीन पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा, सामाजिक समतेची मूल्ये जपण्याचा आणि न्याय, बंधुता व शिक्षणावर आधारित समाज घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या अभिवादन कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. सामाजिक समतेचा संदेश अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करत उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.


Protected Content

Play sound