मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा – उदयनराजे

 

मुंबई प्रतिनिधी । मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशारा भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण अध्यादेशाबाबत ट्विट करुन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. “मी सरकारला सांगू इच्छितो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे. यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे” असं उदयनराजेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. याआधी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात गेले, तरी तिथे ते टिकवता आले. पण आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्काच बसला आहे. फक्त राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही वाईट वेळ मराठा समाजावर आली आहे. महाराष्ट्र सरकार ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण देण्यासाठी कुठलीही विशेष बाब सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहे. हे करत असताना राज्य सरकारने कुठलीही खबरदारी घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण सुनावणी झाली नसताना न्यायालयासमोर काय डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्ण चर्चा झाली नसताना इतका मोठा निर्णय होणं हे मराठा समाजावर अत्यंत अन्यायकारक आहे.

Protected Content