नवी दिल्ली वृत्तसंस्था । निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करून आज काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी एक दिवस उरला असतांना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी ते म्हणाले की, निकालाच्या काही दिवस आधी मोदी पत्रकार परिषद घेत आहेत. मात्र नोटाबंदी, राफेल घोटाळा, जीएसटी, बेरोजगारी, अनिल अंबानी याप्रकरणी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची पंतप्रधान मोदी यांनी उत्तरे द्यावीत. पंतप्रधान मोदी यांची विचारसरणी महात्मा गांधींनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गाची नसून, हिंसेची असल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीही राजकारणात नाही. मी त्यांच्याबाबत काहीही बोलणार नाही. मात्र, त्यांना जर माझ्या कुटुंबियांबद्दल बोलायचे असेल, तर तो त्यांचा प्रश्न असल्याचेही राहूल यांनी नमूद केले.
दरम्यान, राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक आयोगाने काम केले. निवडणूक आयोगाने पक्षपाती केल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडे पैशाची कमतरता नाही. त्यांच्याकडे पैसा असला, तरी आमच्याकडे सत्य आहे आणि सत्याचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.