विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांकडे !

पंढरपूरः वारकरी संप्रदायाने लॉकडाऊनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. साडे पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.

लॉकडाउनमुळं विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील, अशा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

सध्या पंढरपूर मध्ये २०३५ कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाल्याने २४ ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मात्र संघर्ष अटळ बनणार आहे.

राज्यात धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही. यंदा आषाढी वारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली. आषाढी यात्रेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी होती. राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. वारकरी संप्रदाय नाराज असून या नाराजीचा आता स्फोट होण्याची भीती आहे. वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या लढ्याला अधिकच धार आली आहे.

Protected Content