राज्यभरात ईव्हीएममध्ये बिघाड

voting

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज गुरुवारी १० मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात १७९ उमेदवार मैदानात असून १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार १० खासदारांना संसदेत पाठवतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपच्या प्रीतम मुंडे, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, ठिकठिकाणाहून मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी तास दीड तासापासून मतदाराला रांगेत खोळंबून राहावे लागल्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुवारी देशाच्या १२ राज्यांतील ९५ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भातील ३, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा जागांवर मतदान होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे. बऱ्याच ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड झाले आहेत. परभणीतील पालम तालुक्यात आरखेड येथे मशीन बिघाडामुळे एक तासा पासून मतदान बंद होते. पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेवरील मतदान यंत्र बंद पडले. शहरातील मतदान केंद्र क्रमांक 215 व 235 वरील मतदान यंत्र बंद पडल्याने नवीन यंत्र बसविण्यात आले. या ठिकाणी जवळपास अर्धा तास मतदार खोळंबळे होते. मानवत तालुक्यातील सावरगाव येथील मतदान केंद्रावरील एक मशीन अर्धा तासापासून बंद होते. दरम्यान, बेरोजगार तरुण, शेतकरी, छोटे व्यापारी व जाती-धर्माच्या नावावर नाहक त्रास देण्यात आलेल्या लोकांना न्याय मिळावा हे लक्षात ठेवून आज मतदान करा,असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केले आहे.

Add Comment

Protected Content