पटना/नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | दोनवेळा भाजपसोबत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेत असलेल्या नितीशकुमार आणि भाजपचे बिनसले आहे. बिहारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याने जदयुच्या कोणत्याही आमदारांनी पुढचे ७२ तास राजधानी पटना सोडून कोठेही जाऊ नये असे आदेश दिले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सात वेळा नितीशकुमार सत्तेत राहिले आहे. यात दोनवेळा भाजप आणि गतवेळी राजद समवेत हातमिळवणी करत सत्ता काबीज केली होती. या पंचवार्षिक दरम्यान भाजपसोबत सत्ता काबीज केली आहे. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे नुकतेच कारागृहातून बाहेर आले होते. आणि तत्कालीन काळात रेल्वेमंत्री असताना जमिनीच्या बदल्यात रेल्वेत हजारो युवकांना नोकऱ्यांत सामावून घेतले या रेल्वे भरती घोटाळाप्रकरणी दोन दिवसापूर्वीच लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी आणि अन्यत्र १५ ठिकाणी सीबीआयच्या पथकाने छापे घातले होते. हे छापेसत्र सुरु असताना अचानक भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसापासून जदयुच्या नेत्यांच्या बैठका घेत राजद आयोजीत इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली आहे. एकप्रकारे लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र आणि नीतिशकुमार यांनी जवळीक साधली आहे. येत्या ७२ तासात जदयु च्या कोणत्याच आमदाराने राजधानी पटना सोडून जाऊ नये असे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे बिहार मध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.