चिंचखेड खुर्द ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराबाबत खंडपीठात याचिका !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचखेड खुर्द येथील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश शालीग्राम खंडागळे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

नरेश शालीग्राम खंडागळे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ज्येष्ठ विधीज्ज्ञ पी. बी. राखुंडे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे. ही याचिका खंडपीठाने २१०६१/२०२३ क्रमांकाने दाखल करून घेतली आहे. यात नमूद केले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेड खुर्द ग्रामपंचायतीच्या ३/०५/२०२३ आणि १६/०५/२०२३ रोजीच्या ठरावांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या अनुच्छेद ३९ अन्वये चिंचखेडा गावचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी यांना योग्य ते निर्देश द्यावेत अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका ११ जुलै २०२३ रोजी दाखल करण्यात आली असून यावर लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश शालीग्राम खंडागळे पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

Protected Content