पाटणा (वृत्तसंस्था) महानंदा नदीच्या पुरामुळे बिहारमधील कटिहार जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अशा गंभीर परिस्थितीतही सरकारी यंत्रणेच्या निष्क्रीय आहे. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी पूरग्रस्तांवर उंदीर खाऊन पोट भरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कटिहार शहरापासून ३५ किलोमीटरवर असलेल्या कडवा भागातील १२ गावे महानंदा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तब्बल ३०० कुटुंबांना रस्त्याच्या कडेला निवारा केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे. यातील बहुतांश कुटुंब महादलित व अनुसूचित जमातीतील आहेत. पुराने संसार उद्ध्वस्त केल्यापासून या कुटुंबाचे भयंकर हाल होत आहेत. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याने त्यांना उंदीर खाऊन जगावे लागत आहे. ‘पूरग्रस्तांची स्थिती भयंकर आहे. सरकारसाठी हे लज्जास्पद आहे. प्रशासन लोकांना साधी पावरोटी देऊ शकलेले नाही. त्यांना उंदीर खावे लागत आहेत,’ असा संताप आमदार शकील अहमद खान यांनी व्यक्त केला आहे. तर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या राबडी देवी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे प्रशासनाने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत.