प्रवासी चढत असताना वाहकाने बेल वाजवून पुढे नेली बस : पातोंड्यातील धक्कादायक प्रकार !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथे बसमध्ये प्रवासी चढत असतांनाच वाहकाने बेल दाबल्याने बस चालू होऊन प्रवाशांचा जीव टांगणीला लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तालुक्यातील पातोंडा येथे बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास यावल आगाराची पिंपळनेर ते यावल बस क्र.एम.एच २०,बी.एल.१४२५ पातोंडा येथे आली होती. पातोंडा येथील शालेय विद्यार्थी व प्रवासी गाडीत चढत असताना गाडीतील वाहक एस.आर.जाधव यांनी डबल बेल वाजवत चालकाने गाडी सुरू करून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यात चढत असण्याचा प्रयत्नात असलेले प्रवासी पत्रकार सागर मोरे काही सेकंद गाडीला लटकुन असताना देखील चालकाने व वाहकाने गाडी न थांबवता गाडी पुढेच येण्याचा अजब प्रकार घडला.यात सुदैवाने मोरे यांच्या समयसूचकतेने होणारा अपघात टळला.

बुधवार रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पातोंडा बस थांब्यावर सावखेडा व चोपडा जाण्यासाठी विद्यार्थी व प्रवासी उभे होते.त्यावेळी यावल आगाराची पिंपळनेर यावल बस क्र..एम.एच २०,बी.एल.१४२५ ही बस पातोंडा येथे आली.बसमधील प्रवासी उतरून साधारण सात आठ प्रवासी बसमध्ये चढत होते.काही प्रवासी बसमध्ये चढलेत तर उर्वरित चढत असताना त्यातील प्रवासी पत्रकार सागर मोरे हे चढत असताना त्यांचा एक पाय बसमधील शेवटच्या पायरीवर व एक पाय जमिनीवर असताना बसचे वाहक एस.आर.जाधव यांनी डबल वेल वाजवली आणि चालकाने गाडी पुढे नेली.त्यात प्रवासी मोरे यांची भंबेरी उडाली. चालू गाडीत ते काही सेकंद तसेच लटकून होते. हे सर्व घडत असताना वाहकाने व चालकाने गाडी थांबविण्याची तसदी घेतली नाही.या प्रकारात मोरेंचा अपघात होताना वाचला.हा प्रकार पाहून ग्रामस्थ जमा होऊन वाचकाला गाडी थांबवायला सांगितले तरीही वाहकाने गाडी थांबवली नाही.गाडीत शिरल्यावर बसमधील आतील भाग हा पूर्ण खाली होता.प्रवासी ज्याच्या त्याच्या सीटवर बसले होते.प्रवाशांना उभे राहण्यासाठी पुरेपूर जागा असताना देखील तुम्ही प्रवासी चढत असताना डबल बेल वाजवून गाडी का सुरू केली ? याचा जाब विचारल्यावर वाहकाने आम्हाला गाडीत जास्त प्रवासी नेण्याची परवानगी अथवा नियम नाही आहे.आम्ही जास्त प्रवाशांना घेत नाहीत असे अजब उत्तर देऊन उर्मटपणा दाखविला आणि तुम्ही कुठेही जा,काय करायचे करा आमचे काहीही नाही होणार असे देखील वाहकाने सांगितले.

दरम्यान, गाडी खाली असताना आणि चढणारे प्रवासी कमी असताना देखील तुम्ही प्रवासी बसवत नाहीत,बेल वाजवून गाडी दामटतात. काही बस चालक व वाहक गाडी फुल्ल असताना देखील प्रवासी नेतात तर काही चालक वाहक गाडी खाली असताना देखील प्रवासी घेत नसतात.यामुळे एस.टी. महामंडळ तोट्यात का नाही जाणार?एस.टी. महामंडळ एकच असताना देखील वाहक नेहमी दुसर्‍या आगराकडे बोट दाखवतात.पातोंडा येथे वारंवार विद्यार्थी व प्रवासीबाबत चालक व वाहक यांच्या मनमानीपणा व गैर वर्तणुकीचे प्रकार घडत आहेत. जर एखादा वृद्ध प्रवासी असता तर अपघात झाल्यावाचून राहिला नसता.याबाबत पत्रकार मोरे यांनी जळगाव विभागाचे वाहतूक नियंत्रक भगवान जगनोर व यावल आगाराचे व्यवस्थापक दिपक महाजन यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केली.त्यांनी याबाबत लेखी तक्रार देण्याचे सांगून कार्यवाही करण्याचे सांगितले.

एस.टी. कडून आम्हाला तक्रार पुस्तिका मिळत नाही !

घटनेची तक्रार करण्यासाठी वाहकाकडे तक्रार पुस्तिका मागितली असता एस.टी. महामंडळाने आम्हालाच तक्रार पुस्तिका दिलीच नसल्याचे वाहकाने सांगितले. प्रत्येक प्रवासी काही ना काही कारणाने प्रवास करीत असतो.प्रवासात अशा अनेक घटना घडत असतात त्यासाठी वाहकाकडे तक्रार पुस्तिका असणे हा एसटीचा नियम आहे.जर महामंडळाने वाहकांना तक्रार पुस्तिका दिल्या नसतील तर प्रवाशांनी तक्रारी कुणाकडे करायच्या ? हा प्रश्‍न उपस्थिती होत आहे.

टोल फ्री नंबर ‘नौट रीचेबल’

घटनेची पत्रकार मोरे हे तक्रार महामंडळाच्या टोल फ्री नंबर १८००२२१२५० वर करायला गेले तर सदरील नंबर नौट रीचेबल सांगत होता. प्रवाशांना एखाद्या घटनेची तक्रार नोंद करण्यासाठी आपले काम सोडून बस स्थानकावर जाता येणे शक्य नसते.त्यामुळे महामंडळाने ऑनलाईन तक्रार नोंद करण्यासाठी हेल्पलाईन नंबर आणावा व वाहकाकडे तक्रार पुस्तिका देखील उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी तयंनी केली आहे.

सभ्यतेचे धडे द्यावेत : मोरे

या संदर्भात सागर मोरे म्हणाले की, पातोंडा येथे विद्यार्थी व प्रवाशांसोबत अशा घटना वारंवार घडत आहेत.विद्यार्थी व प्रवासी फुकट प्रवास करत नाहीत. प्रवासी आहेत तर एस.टी.आहे हे कर्मचार्‍यांनी लक्षात घ्यावे.चालक व वाहकांना सभ्य वागणुकीचे धडे द्यावेत अन्यथा पातोंडा येथील प्रवासी व ग्रामस्थ रस्त्यावर येऊन एकही बस धावू देणार नाहीत.

Protected Content