नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये वाद तापलेले असतांना पाकिस्तानला आणखी एक जोरदार धक्का बसल्याचे वृत्त हाती आले आहे. भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानकडून आशियाई स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. यामुळे आता स्पर्धेचे ठिकाण नवी असणार आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पण भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला. भारताच्या या नकारामुळे आता ही स्पर्धा बांगलादेश, श्रीलंका अथवा दुबईमध्ये आयोजित करण्यातचा विचार सुरू आहे. भारताच्या नकारानंतर पाकिस्तानचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने श्रीलंका संघाचा दौरा यशस्वी करून दाखवला होता. १० वर्षापूर्वी श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाले होते. जगातील सर्वच संघांनी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. तेव्हापासून पाकिस्तानचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जात होते. श्रीलंका दौरा यशस्वी केल्यानंतर देखील बांगलादेशने पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. यावरून सध्या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये वाद सुरू आहे.