एक कोटी मजुरांनी पायी घर गाठलं – सरकारची माहिती

नवी दिल्ली- लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मार्च 2020 ते जून 2020 दरम्यान एक कोटीहून अधिक मजुरांनी आपआपल्या राज्यात पायी स्थलांतर केलं, अशी माहिती सरकारने मंगळवारी लोकसभेत लिखीत स्वरुपात दिली आहे.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. उपजिविकेसाठी विविध राज्यामध्ये असणाऱ्या मजुरांनी लॉकडाऊननंतर स्वगृही परतण्यास सुरुवात केली. मात्र वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने असंख्य मजुरांना रस्त्यावर उतरत पायी घर गाठलं. 

रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, कोविड 19 महामारीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मजूरांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलं. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळापास 1.06 कोटी मजुरांनी स्थलांतर केलं, यामध्ये पायी प्रवास केलेल्या मजुरांचाही समावेश आहे.

मार्च-जून 2020 दरम्यान 81 हजार 385 रस्ते अपघात झाले. यामध्ये जखमींचा आकडा 29 हजार 415 आहे, अशी माहिती त्यांनी संसदेत दिली. मात्र स्थलांतरादरम्यान रस्ते अपघातात मरण पावलेल्या मजुरांसंदर्भात मंत्रालयाने स्वतंत्र डेटा ठेवलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Protected Content