…आता कर्णकर्कश्य हॉर्नऐवजी ऐकू येणार मधुर स्वर !

नागपूर प्रतिनिधी | आपण जर कर्णकर्कश्य हॉर्नमुळे हैराण झाले असाल तर आपल्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच हॉर्नऐवजी विविध वाद्ययंत्रांचे स्वर ऐकू येणार असून याबाबतच्या निर्णयाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

वाहनांमध्ये मोठ्या आवाजाच्या हॉर्नऐवजी आता भारतीय वाद्यांचा वापर करण्याच्या दिशेनं पावलं पडत असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

वायूप्रदुषणासोबत सध्या ध्वनीप्रदुषणदेखील वाढत आहे. अनेक वाहनचालक त्यांच्या गाडीला मोठ्या आवाजाचे हॉर्न बसवून घेतात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण गरज नसताना कर्कश हॉर्न वाजवताना दिसतात. तर अनेकदा या मोठ्या हॉर्नमुळे वाहनचालकांचं वाहनावरचं नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटनादेखील घडत असतत. हे टाळण्यासाठी आता कर्कश ह़ॉर्नच्या जागी भारतीय वाद्यांचा वापर करता येईल का, याचा विचार करण्याचे आदेश वाहतूक मंत्रालयाला देणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

रस्त्यावर वाहनांच्या गर्दीत सतत मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजत असल्याने वाहनचालकांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होतो. रस्त्याजवळ राहणार्‍या घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवरदेखील हॉर्नच्या आवाजाचे विपरित परिणाम होत असतात. तसेच वेगवेगळे आजार असणार्‍या रुग्णांनादेखील हॉर्नमुळे त्रास होतो. हॉर्नचा उद्देश पूर्ण व्हावा मात्र आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी एक अनोखी कल्पना गडकरींनी मंत्रालयाला सुचवली आहे. त्यानुसार तबला, पेटी, तनपुरा, बासरी यासारख्या भारतीय वाद्यांचा वापर करून नव्या प्रकारचे हॉर्न तयार करण्यावर विचार सुरू आहे. हे हॉर्न काही वर्षांनी बाजारात दाखल होतील आणि मग रस्त्याने जाताना संगीत कानावर पडत राहिल, असं गडकरी म्हणाले.

 

Protected Content