राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे उद्या राज्यभर घंटानाद आंदोलन

मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने उद्या राज्यभर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करणार आहे. 

हे आंदोलन सकाळी ११ वाजता प्रत्येक जिल्हा आणि शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर जमून घंटानाद करीत निदर्शने करत टपाल मास्टर यांना महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अजय बिष्ट यांच्या नावे लिहिलेली पत्रे त्यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी दिली जाणार आहे. 

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या पुणे येथील लक्ष्मी रोड,सिटी पोस्ट टपाल कार्यालयाबाहेर आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. 

उत्तर प्रदेशातील महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत अजय बिष्ट सरकार गंभीर नाही. त्यामुळेच त्यांचे योगी आदित्यनाथ हे नाव न वापरता त्यांच्या मूळ नावे त्यांना पत्रे दिली आहेत. योगी हा शब्द फार जबाबदारीचा असून ही जबाबदारी पार पाडण्यास अजय बिष्ट सक्षम नसल्यामुळे त्यांचा तसा उल्लेख या पत्रात टाळला आहे. फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मश्गुल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत, त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. नामुष्की सहन करावी लागत आहे, अशा आशयाची ही पत्रे लिहिली असून त्याचा भला मोठा गठ्ठा महाराष्ट्रातून जाणार आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

 

Protected Content