ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऊसतोड कामगारांना बोलावण्याची कसरत

पाचोरा प्रतिनिधी । जिल्ह्यातील सुमारे ९० हजार तर पाचोरा तालुक्यातील १० हजार ऊसतोड कामगार गेल्या सप्टेंबर महिन्यात पुणे, अहमदनगर, गुजराथ आणि मध्यप्रदेशात ऊस तोडणीसाठी गेलेले असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारांचे महत्त्व असल्याने उमेदवार ऊस तोडीसाठी गेलेल्या मजुरांशी भ्रमणध्वनीद्वारे बोलुन त्यांना व्हाट्सअपचा सहारा घेत त्यांना आणण्यासाठी उमेदवारांची मोठी दमछाक होणार आहे. यासाठी प्रवास भाडे व मजुरीचा खर्च द्यावा लागणार असल्याने उमेदवारांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

 पाचोरा तालुक्यातील निंभोरी तांडा, सातगाव तांडा, वरसाडे तांडा, कोकडी तांडा, मोहाडी तांडा, नाईकनगर तांडा येथील बंजारा समाजाचे ऊस तोड कामगार त्याच प्रमाणे सार्वे बु” प्र. पा., राजुरी, कोल्हे, मोंढाळे, डोंगरगांव, वाडी, सातगाव (डोंगरी), शिंदाळ, पिंपळगाव (हरे.), अटलगव्हान येथील तडवी, भिल्ल, कुणबी पाटील, कोळी सह विविध समाजाचे ऊस तोड कामगार अहमदनगर व जिल्ह्यातील प्रवरानगर, बारामती, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, दौंड, इंदापूर, पाथर्डी, पाटस, आंबेगाव, मालेगाव, भोर यासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यात ऊसतोडीला गेलेले आहेत. दरवेळी ग्रामपंचायत निवडणुका जुलै / आॅगस्ट महिन्यात होत असतात. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातल्याने यावर्षी निवडणुका जानेवारी महिन्यात होवु घातल्या असुन पाचोरा तालुक्यातील सुमारे १० हजार ऊस तोड कामगार सप्टेंबर महिन्यातच ऊसतोडणीसाठी गेलेले असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हे मतदार आणण्यासाठी उमेदवार व पॅनल प्रमुखांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सुमारे ४०० ते ५०० किलो मीटर वरुन मतदार आणण्यासाठी मोठ्या स्वरुपाचा खर्च होणार असल्याने उमेदवारांची चांगलीच फजीती होतांना पहावयास मिळत आहे.

Protected Content