विदर्भाला हरवून मुंबई ४२ व्यादा रणजी ट्रॉफी विजयी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. मुंबईने आठ वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. मुंबईने विदर्भाला विजयासाठी ५३८ धावाचे आव्हान दिले होते. विदर्भानेही जोरदार खेळी करत संपूर्ण चौथा दिवस खेळून काढला. तर पाचव्या दिवशीही जोरदार सुरुवात केली. जेवण सत्रानंतर विदर्भाचा कॅप्टन अक्षय वाडकर शतक ठोकून आऊट झाला. मुंबईने लंचनंतर विदर्भाला एक एक बळी घेत झटपट धक्के दिले. तर धवल कुलकर्णी याने आपल्या अखेरच्या सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिली आणि शेवटची विकेट घेत विदर्भाला ऑलआऊट केले.

या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर उर्वरित चारही दिवसात मुंबई संघाचे वर्चस्व दिसून आले. विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी मुंबईने विदर्भाला ५३८ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना विदर्भ संघाने आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली परंतु केवळ ३६८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विदर्भ संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 गडी गमावून 248 धावा केल्या होत्या. यानंतर संघाला कर्णधार अक्षर वाडकरकडून मॅचविनिंग इनिंगची अपेक्षा होती. पाचव्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात विदर्भ संघाने एकही गडी गमावला नाही, मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रात मुंबई संघाने दमदार पुनरागमन करताना प्रथम अक्षय वाडकरला वैयक्तिक १०२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आणि हर्ष दुबेलाही ६५ च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर मुंबईने विजयाच्या दिशेने पावले टाकले. येथून विदर्भाचा डाव गडगडण्यास जास्त वेळ लागला नाही आणि संपूर्ण संघ ३६८ धावांवर आटोपला. मुंबईकडून या डावात तनुष कोटियनने ४  तर तुषार देशपांडे आणि मुशीर खानने २-२ बळी घेतले. शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळविले.

Protected Content