भटक्या कुत्र्यांचा कहर : लचके तोडल्याने सहा बकर्‍या दगावल्या

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरूच असून रात्री कुत्र्यांनी लचके तोडल्याने सहा बकर्‍या दगावल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

मुक्ताईनगर शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे दिसून आले आहे. यात प्रभाग क्रमांक अकरामध्ये तीन दिवसांपूर्वीच कुत्र्यांच्या हल्ल्यात बकर्‍यांचा बळी गेला होता. यानंतर परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली तरी यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. यानंतर रात्री पुन्हा एकदा कुत्र्यांमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्मित झाले आहे.

शहरातील वॉटर सप्लाय कार्यालयाच्या जवळच असलेल्या भागातील रहिवासी आसीफ मिस्तरी आणि आरीफ शेख आझम यांच्या मालकीच्या बकर्‍यांवर हल्ला चढविला. यात लचके तोडल्याने सहा बकर्‍यांनी प्राण सोडला असून चार बकर्‍या जखमी झाल्या आहेत. नगरपंचायतीकडे याआधी तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी यावर काहीही कार्यवाही न झाल्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. आता तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Protected Content