फैजपूर प्रतिनिधी । तीन भावंडांची लाडकी असलेली लहानगी मुक्ताई आपल्या भावंडांच्या साहित्य लेखनाची प्रेरणा बनली. ताटी उघडून बाहेर आल्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. इतर संतांसाठी सुद्धा मुक्ताईचे साहित्य आदर्श व दिशादर्शक ठरले. त्यामुळे मुक्ताईंचे साहित्यिक तत्वज्ञान मानवी जीवनासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन महामंडलेश्वर आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी येथे केले. फैजपूर येथील श्रीसतपंथ मंदिर संस्थानमध्ये श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गाथा भेटीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुक्ताई गाथा प्रकाशक लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी महामंडलेश्वर यांना मुक्ताई गाथा भेट दिली. यावेळी प्रा. उमाकांत पाटील, डॉ. जगदीश पाटील, फैजपूर म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एल. आगळे, बी. डी. महाले, संजय सराफ, सी. डी. धांडे, सुधीर राजपूत आदी उपस्थित होते. महामंडलेश्वर आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतात वारकरी संप्रदायाची वाटचाल आणि सध्या त्यामध्ये होत जाणारे विविध बदल यावर सडेतोड भाष्य केले. मुक्ताईंच्या साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याकरिता ॲड. गोपाल दशरथ चौधरी, लक्ष्मण महाराज चिखलीकर व डॉ. जगदीश पाटील यांचे त्यांनी विशेष कौतुक करून हा गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.