पाचोरा येथे ठाकरे सरकारच्या विरोधात मशाल मोर्चा (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे नेतृत्वात ठाकरे सरकारच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला. त्याची सुरुवात अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय पाचोरा येथून करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून त्याची सांगता करण्यात आली.

ऐन रब्बी हंगामाच्या पिकांचा घास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला असताना या जुलमी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. आधीच गेल्या वर्षापासून कोरोना महामारीच्या च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असताना त्यांच्या मालाला बाजारात भाव मिळत नाही त्यात खूप महिने मेहनत करून शेतकरी आपल्या पिकांना लहान-बाळा प्रमाणे जतन करून वाढवतो आणि आता जवळपास सर्वच पिके शेवटच्या टप्प्यात असून एखाद – दोन पाण्याने ते उत्पन्न शेतकऱ्याच्या घरात येईल परंतु तोपर्यंत असंवेदनशील मुघलशाही सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची गुरे देखील पाण्यावाचून वंचित राहत आहेत.गुरांना पाणी पाजावे कसे ? ही एक मोठी समस्या आज शेतकर्‍यांपुढे उभे राहिली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडणी त्वरित थांबवावी व ज्या कृषीपंपांची वीज तोडणी केली आहे.ती त्वरित जोडणी करून पूर्ववत सुरू करावी जेणेकरून शेतकरी बांधवांचा हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास त्यांच्या घरापर्यंत येऊ शकेल असे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

तसेच आमदार मंगेश चव्हाण हे शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी जळगाव येथील महावितरण कार्यालयात गेले असता शासनाने दडपशाही पद्धतीने त्यांच्यावर शेतकऱ्यांसमवेत गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आम्ही निषेध करतो असे सांगून त्यांनी निषेध व्यक्त केला. याप्रसंगी जि. प.सदस्य व जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मत पाटील, सरचिटणीस संजय पाटील, दिपक माने, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे,उपाध्यक्ष राहुल गायकवाड, सरचिटणीस भैया ठाकूर, कुमार खेडकर सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content