मलिक म्हणतात मला होती राष्ट्रपती बनविण्याची ऑफर !  

नवी दिल्ली – मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपण शेतकरी आंदोलनावरून भाष्य न करता शांत राहिलो तर राष्ट्रपती बनविण्यात येईल अशी भाजपने ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला आहे.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्याला राष्ट्रपतीपदाचे आमिष दाखवले आणि गप्प राहिलात तर तुम्हाला राष्ट्रपती बनवले जाईल असं सांगितल्याचा मोठा दावा मलिक यांनी केला. तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकर्‍यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. हरियाणाच्या जिंदमध्ये आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

मलिक पुढे म्हणाले की, सहा ते सात महिन्यांत आपला राज्यपालपदाचा कार्यकाळ संपणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर मी उत्तर भारतातील सर्व शेतकर्‍यांना एकत्र करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. याप्रसंगी त्यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली. ते म्हणाले की, आपण ७०० हून अधिक शेतकरी बांधवांना गमावले आहे. पण श्वानांच्या मृत्यूवर पत्र लिहिणार्‍या पंतप्रधानांनी त्या शेतकर्‍यांच्या मृत्यूवर एकही शब्दही काढला नाही. केंद्र सरकार एमएसपीवर कायदेशीर हमी देण्यात अपयशी ठरले आहे.

Protected Content