
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर 17 जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजप सर्वाधिक 11 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना (शिंदे गट) 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे.

अंतिम फॉर्म्युलानुसार भाजपच्या वाट्याला सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा आणि नांदेड या जागा आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला कोकण आणि पुणे, तर शिवसेना शिंदे गटाला ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या जागा देण्यात आल्या आहेत.
जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसला अतिरिक्त एक जागा मिळवण्यात यश आले. मात्र सात जागांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला चार जागांवरच समाधान मानावे लागल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरची महत्त्वाची जागाही भाजपकडे गेली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे विधान परिषदेतील अनेक जागा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून दिले जातात. नियमांनुसार, मतदारसंघातील किमान 75 टक्के मतदार उपलब्ध असल्यासच निवडणूक घेता येते.
या निकषांनुसार आता प्रलंबित विधान परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, सोलापूर, जळगाव, नांदेड, पुणे, ठाणे, नाशिक, अमरावती, भंडारा-गोंदिया, सांगली-सातारा आणि यवतमाळसह विविध मतदारसंघांत लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता उमेदवारी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.



