राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उसने अवसान आणू नये ! – चंद्रकांत बाविस्कर

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील ज्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ते कधीही भाजपचे पदाधिकारी वा कार्यकर्ते नसल्याचा दावा करत, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उसने अवसान आणू नये असे प्रतिपादन भाजपचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

मंगळवारी जामनेर तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील सुमारे २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावर भाजपचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

चंद्रकांत बाविस्कर यांनी या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरं बघायला गेलं तर हा प्रवेश स्थानिक राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे पाठ करून नवीन नाथाभाऊंच्या नेतृत्वाकडे घडलेला आहे. मुळात ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला ते कधी भाजपवासी नव्हतेच. आपल्याच कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षात फक्त कामगिरी दिसावी म्हणून घडवून आणलेले हे प्रवेशाचे महानाट्य आहे असेच म्हणावे लागेल. आता यात विचार करण्यासारखे असे आहे की ज्या ज्या मंडळींनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असे दाखवण्याचे चित्र आहे ही मंडळी कधीच भाजपाची नव्हती असा दावा यात करण्यात आला आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुक्ताईनगर येथे जामनेर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याची बातमी ही व्हायरल झाली आहे. त्यात असं म्हटलं की जामनेर तालुक्यातील देवपिंपरी आणि नेरी येथील २०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात असं दाखवण्यात आलं की भाजपाला जामनेर तालुक्याला खिंडार पडले. तथापि, ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यात एकही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा मुळात न होता,न आहे ! राष्ट्रवादीचे उसने अवसान आणण्याचा कार्यक्रम होता. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ते भाजपाचे कार्यकर्ते होते आणि आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेला आहे. तर माझा प्रश्‍न असा आहे की ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यातले किती भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य अथवा भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य होते किंवा आहेत ? तसेच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य सुद्धा या मंडळींपैकी कोणीच नव्हते. ते परंपरागत काँग्रेस विचारावर चालणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या घरातले कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दाखवून मुक्ताईनगरला नेऊन त्यांच्याच राष्ट्रवादी व काँग्रेसचेच कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश दाखवला व मीडियातून सनसनाटी कशी निर्माण होईल याचा खोटा प्रकार हा मुक्ताईनगर मध्ये घडल्याचा आरोप यात केला आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, भाजपाचा कोणताही कार्यकर्ता पक्ष सोडून गेलेला नाही जामनेर भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास आहे. त्यांच्या नेतृत्वावर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे कुठेच खिंडार पडलेली नाही सगळे कार्यकर्ते आहे तिथेच आहेत. जेथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम दाखवण्यात आला त्या मतदारसंघात त्यांनी लक्ष द्यावे. कारण जामनेर मतदारसंघात आमदार गिरीशभाऊ महाजन सातत्याने वाढत्या मताधिक्याने निवडून येत आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात स्वतः ते निवडणुकीच्या प्रचारात नव्हते तरीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ४० हजाराच्या लीडने निवडून आले आहेत. त्याच वेळी आपली आपल्या मतदारसंघात काय अवस्था आहे त्याचे चिंतन आपण करावे. जामनेर तालुक्याची काळजी घ्यायला गिरीशभाऊ समर्थ आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून नेत्यांनी त्यांचे उसने अवसान आणून हसे करून घेऊ नये असा खोचक सल्ला या निवेदनात भाजपचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी दिला आहे.

Protected Content