जिल्ह्यातील रूग्णांसाठी आ. गिरीश महाजन यांच्याकडून २० टन ऑक्सीजनचा साठा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्‍वभूमिवर आज माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी जिल्ह्यासाठी तब्बल २० टन प्राणवायूचा साठा उपलब्ध करून दिला असून याचा आपत्कालीन स्थितीत उपयोग होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाने हैदोस घातला आहे. दररोज कोरोना बाधीतांची संख्या वाढीस लागली असून मृत्यूंची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तर यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी याला सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील जनता अक्षरश: वार्‍यावर असल्याचे दिसून येत आहे. आ. गिरीशभाऊ महाजन यांनी गेल्या आठवड्यात एफडीएच्या आयुक्तांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यात पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याला मान्यता मिळाल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे. यानंतर आता आमदार महाजन यांनी प्राणवायूच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. याचा विचार करून आ. गिरीश महाजन यांनी वैयक्तीक पातळीवरून हालचाली करून जिल्ह्यासाठी तब्बल २० टन इतका ऑक्सीजन उपलब्ध करून दिला आहे. याचा साठा करण्यात येणार असून जिल्ह्यात जिथे कुठे ऑक्सीजनची कमतरता भासेल तिथे याचा वापर केला जाणार आहे. आज दुपारी हा टँकर जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

Protected Content