पुणे प्रतिनिधी । बहुचर्चीत बीएचआर घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व संशयितांना आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वी जळगावात धडक कारवाई केली होती. यासोबत राज्यातील काही शहरांमध्येही एकाच वेळी कारवाई करण्यात आली होती. यात जळगाव येथील ख्यातनाम व्यावसायिक भागवत भंगाळे, उद्योजक प्रेम कोगटा, जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन झालटे व राजेश जैन; औरंगाबाद येथील सहकारातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे अंबादास बाबाजी मानकापे, मुंबई येथील जयश्री अंतिम तोतला, भुसावळ येथील आसिफ मुन्ना तेली, जळगाव येथील जयश्री मणियार व संजय तोतला, तसेच धुळे येथील प्रितेश चंपालाल जैन (धुळे) यांचा समावेश होता. अटक करण्यात आलेले सर्व मान्यवर हे हाय-प्रोफाईल या प्रकारातील असल्याने खळबळ उडाली होती.
या सर्वाना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्व संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायमूर्तींनी सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.