नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या समर्थकांचे दोन गट असून त्यांच्यातील संघर्षानेच संघ उपांत्य फेरीत हरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
टाईम्स नाऊ या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघाला गटबाजीने ग्रासले असल्यामुळेच संघाचा विश्वचषकातील उपांत्य फेरीत पराभव झाला. यानुसार संघातील एका खेळाडूने दिलेल्या माहितीनुसार टिम इंडियात विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दोन गट तयार झाले आहेत. विश्वचषकातील संघात अंबाती रायूडूला घ्यावे असा रोहितचा आग्रह असतांना विराटमुळे विजय शंकरला एंट्री देण्यात आली. याचा संघाला फटका बसला. विराटला संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा पाठींबा आहे. यामुळे त्याच्या मर्जीनुसारच संघ निवडला जातो. एवढेच नव्हे तर फलंदाजीच्या क्रमावरून विराट आणि रवी शास्त्री हे मनमानी करतात. यातच युजवेंद्र चहल यालादेखील विराटचाच पाठींबा असल्याचे मानले जाते. तर रायडूला विश्वचषकातून पध्दतशीरपणे बाद करण्यात आल्याची माहितीदेखील या खेळाडून दिली आहे. यामुळे आता संघात गटबाजीला उधाण आले असून याचीच परिणिती उपांत्य फेरीतील पराभवात झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. या संदर्भात बीसीसीआयने अद्यप तरी अधिकृत भाष्य केलेले नाही.