नागपूर, वृत्तसंस्था | येथे उद्यापासून सुरु होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सावरकरवादाच्या पार्श्वभूमीवर हा बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फडणवीस म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेवर असून, त्यांच्यामध्ये विसंवाद आहे. भरपूर वेळ असतानाही सरकारने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला आहे. हिवाळी अधिवेशन होत आहे, पण राज्याला मंत्रीच नाहीत. त्यामुळे विषय कुणाकडे मांडायचे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. त्यामुळे अशा सरकारच्या चाहापानाला जाण्यात आम्हाला रस नाही.
तसेच वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत, त्यांच्या चहापानाला आम्ही जाऊ शकत नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या विधानावर निषेधाचा प्रस्तावही मांडला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.