थकित मानधन न मिळाल्यास कामबंद – आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचा इशारा

यावल प्रतिनिधी | आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे थकित मानधन मिळावे या अशी मागणी करण्यात आली असून तात्काळ मानधन न मिळाल्यास कामबंद करण्यात येईल असा इशारा संघटनेने ऑनलाईन निवेदनाद्वारे दिला आहे.

राज्यातील कोरोना संकटाच्या काळात उत्कृष्ठ आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक तीन महिन्यांपासून मानधनाची प्रतिक्षेत असून त्यांचे मानधन तात्काळ न मिळाल्यास कामबंद करण्यात येईल असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला असल्याचे रामकृष्ण बी. पाटील यांनी कळविले आहे.

या निवेदनात, “मागील दोन वर्षापासून राज्यात कोरोना संसर्गाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता खंबीरपणे सामना करणाऱ्या तसेच अनेकांचा जीव वाचविणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासनाने नोव्हेंबर २०२१ पासून नियमित कामाचे मानधन अदा केलेले नाही.

शासन आदेशानुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दरमहा १ तारखेपर्यंत मानधन देणे बंधनकारक आहे. असे असताना राज्यातील आशाताई आणि गटप्रवर्तकांना नोव्हेंबर २०२१ पासून मानधन मिळालेले नाही. रिणामी या गरीब कुटुंबातील आणि दारिद्रय रेषेखालील महाराष्ट्र राज्यातील सुमारे ७२ हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या आजाराच्या संकटकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे‌.

आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक आपल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासह नियमित कामकाज सांभाळून ‘कोविड १९’ लसीकरणाची पडताळणी करणे, लसीकरणासाठी नागरिकांना बोलवणे, जनजागृती करणे, लसीकरणासंबंधी माहिती अद्ययावत व संकलन करणे, वरीष्ठ पातळीवर वेळोवेळी माहिती पाठविणे अशा प्रकारची कामे आशा स्वयंसेविका रात्रंदिवस आजही करीत आहेत. असे असतांनाही सदर कामाचा स्वतंत्र मोबदला त्यांना दिला जात नाहीये. परिणामी आशाताईंमध्ये प्रचंड नाराजी आहे.

शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या कामाची दखल घेऊन नोव्हेंबर २०२१ पासूनचे थकीत मानधन अदा करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार थांबवावी आणि यापुढे दरमहा १ तारखेला मानधन देण्यात यावे तसेच कोविड लसीकरणाच्या कामाचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांनाही मोबदला लागू करावा.” अशा आशयाच्या मागणीचे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे व आरोग्य विभाग यांच्यासह डॉ.प्रदिप व्यास, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ.रामास्वामी, एन.आयुक्त आरोग्य सेवा तसेच सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मंत्रालय मुंबई यांना संघटनेने ई-मेलव्दारे पाठविले आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे थकित मानधन तात्काळ न मिळाल्यास कामबंद करतील असा इशाराही निवेदनाद्वारे संघटनेने दिलेला असल्याचेही रामकृष्ण बी. पाटील यांनी कळविले आहे.

Protected Content