जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने संसदेत वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मुर्शिदाबाद येथे रोहिंग्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन हिंदू समुदायाला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) या घटनेचा तीव्र निषेध करत बंगालमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
विहिंपने दिलेल्या माहितीनुसार, मुर्शिदाबादमध्ये जमावाने हिंदूंची सुमारे साडेतीनशे दुकाने जाळून खाक केली, घरे लुटली आणि महिलांवर अत्याचार केले. या भयावह परिस्थितीत ५०० हून अधिक हिंदू कुटुंबांना आपले घरदार सोडून पलायन करण्याची वेळ आली आहे. वक्फ विधेयक हे घटनात्मक मार्गाने संसदेत मंजूर झाले असले तरी, त्यामध्ये हिंदू समाजाची भूमिका विचारात घेण्यात आली नसल्याचा आरोप विहिंपने केला आहे.
परिषदेने म्हटले आहे की, मुर्शिदाबादमध्ये केवळ हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, यावरून बंगालमधील या भागात हिंदूंचे अस्तित्व संपवण्याचा उद्देश स्पष्ट होतो. अशा गंभीर परिस्थितीत तेथील तृणमूल काँग्रेस सरकार कोणतीही ठोस भूमिका घेण्यास तयार नाही, उलट दंगलखोरांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप विहिंपने केला आहे.
परिषदेने बंगालमधील परिस्थितीचे गंभीर चित्र मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक सणासाठी न्यायालयाची परवानगी मिळाल्याशिवाय तो सण साजरा करता येत नाही. तेथील स्थानिक हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असून, पोलीस प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय आहे. ही हिंसा केवळ मुर्शिदाबादमध्येच नव्हे, तर संपूर्ण बंगालमध्ये पसरत असून, लवकरच त्याचे पडसाद देशभरात दिसू शकतात, असा इशारा विहिंपने दिला आहे. त्यामुळे या ‘जिहादी’ वृत्तीला वेळीच थांबवणे गरजेचे आहे, अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे.
विश्व हिंदू परिषदेने बंगालमधील संपूर्ण हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (NIA) करण्याची मागणी केली आहे. तसेच, तातडीने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना विश्व हिंदू परिषदेचे विभाग सहमंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा कार्यवाह हितेश पवार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, जिल्हा संयोजक राकेश लोहार, हरीश कोल्हे, मनोज चौधरी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.