डांभुर्णीतील बिबट्या सावखेड्यातील नव्हे; अजून दुसऱ्या बिबट्याची शक्यता !

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पाड्यांवर आणि शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे, दोन लहान मुलांचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद झाला असला तरी, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पकडलेला बिबट्या हा त्यांनी पाहिलेला बिबट्या नाही, त्यामुळे परिसरात आणखी एक बिबट्या मोकाट असण्याची शक्यता आहे.

दिनांक १६ मार्च आणि १६ एप्रिलच्या दरम्यान मोहराळा, दहिगाव, जामुनझिरा या शेतशिवारात अनेक नागरिकांना बिबट्या वावरताना दिसला होता. दहिगाव शिवारात २३ मार्च रोजी यावल पंचायत समितीचे माजी सदस्य शेखर सोपान पाटील यांना त्यांच्या शेताजवळ बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी पाहिलेला बिबट्या हा पकडलेला बिबट्या नाही. त्यामुळे वन विभागाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने लक्ष देऊन योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

यापूर्वी तालुक्यातील साखळी माणकी शिवारात आदिवासी पावरा समाजाच्या केशा नावाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. परवा झालेल्या दुर्दैवी घटनेतही आठ तासांच्या आत बिबट्या त्याच ठिकाणी परतण्याची शक्यता असताना वन विभागाने वेळीच दक्षता घेतली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जर त्यावेळी योग्य बंदोबस्त केला असता, तर दोन वर्षीय बालिकेचा जीव वाचवता आला असता, असे त्यांचे म्हणणे आहे. वन विभागाच्या या निष्काळजीपणामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये अजूनही घबराट पसरलेली आहे. सध्या मकी आणि कांदा काढणीसारखी महत्त्वाची कामे सुरू असल्याने, या भीतीमुळे कामावर परिणाम होत आहे.

शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, परिसरात असलेला दुसरा बिबट्या शोधण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. शेखर पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पाहिलेला बिबट्या कमी वयाचा होता, त्यामुळे तो पकडलेला बिबट्या नसल्याचे त्यांचे मत अधिक दृढ झाले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी वन विभागाची खरडपट्टी काढली नसती, तर कदाचित पकडलेला बिबट्याही मिळाला नसता. आता बिबट्याच्या विषयावरून पुन्हा आमदारांकडून फटकारणी होऊ नये, यासाठी वन विभागाने तत्परता दाखवून दुसरी कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी दुसऱ्या बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ करत आहेत.

Protected Content