घरकुल योजनेत महाघोटाळा! कागदोपत्री लाभार्थी वंचित, दुसऱ्याने लाटले अनुदान

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निरूळ येथे प्रधानमंत्री आवास योजनेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कागदोपत्री लाभार्थी असलेल्या गणेश शामराव शिंदे यांच्या घरी ग्रामपंचायतीचा शिपाई घरकुल पूर्ण झाल्याची पाटी लावून फोटो काढण्यासाठी पोहोचला, तेव्हा हा सर्व घोटाळा समोर आला. प्रत्यक्षात गणेश शिंदे यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही, तर गावातील दुसऱ्याच व्यक्तीने त्यांच्या नावावर घरकुल अनुदानाचे पैसे उचलल्याचे उघड झाले आहे. गणेश शिंदे यांचे पुतणे समाधान शिंदे यांनी केलेल्या तपासामुळे हा प्रकार प्रकाशात आला आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजूंना स्वतःचे घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पंचायत समितीमध्ये असाच घोटाळा उघडकीस आला होता आणि आता रावेर पंचायत समिती अंतर्गतही त्याच प्रकारची घटना समोर आली आहे.

गणेश शामराव शिंदे यांना २०१७ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. परंतु त्यांच्या नावावर स्वतःची जागा नसल्यामुळे हे घरकुल रखडले होते. आश्चर्याची बाब म्हणजे, २०२५ मध्ये ग्रामपंचायतीचा शिपाई त्यांच्या घरी घरकुल पूर्णत्वाची पाटी लावण्यासाठी पोहोचला, तेव्हा त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे समोर आले. यानंतर समाधान शिंदे यांनी अधिक चौकशी केली असता, गणेश शिंदे यांच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले. ज्या व्यक्तीने हा लाभ घेतला, त्याचे नाव गणेश महाजन असल्याचे समजते. महाजन यांनी सांगितले की, ग्रामसेवकांनी त्यांना रीतसर पत्र देऊन हा लाभ घेण्यास सांगितला होता.

या घोटाळ्यात गणेश शिंदे यांच्या नावे घरकुल मंजूर असल्याचे दाखवून, सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा निधी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात वळता करण्यात आला. पंचायत समितीच्या निष्काळजीपणा आणि बँक अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे शासकीय अनुदानाची रक्कम अपात्र व्यक्तीच्या हाती गेली.

समाधान शिंदे यांनी या प्रकरणी रावेर पंचायत समिती आणि स्थानिक ग्रामसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या, परंतु त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेरीस त्यांनी हा गंभीर प्रकार माध्यमांसमोर आणला आहे. हा सर्व गैरव्यवहार तत्कालीन गटविकास अधिकारी (बिडिओ) दिपाली कोतवाल आणि डॉ. सानिया नाकाडे यांच्या कार्यकाळात झाला असल्याचे समाधान शिंदे यांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौ. मीनल करनवाल प्रयत्नशील असताना, त्यांच्याच कार्यक्षेत्रात अशा प्रकारचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता या प्रकरणी प्रशासन कोणती कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सर्व भोंगळ कारभार रावेर पंचायत समितीच्या घरकुल विभागात काम करणारे कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्यामुळे झाला असल्याचा आरोप होत आहे.

Protected Content