मुंबई वृत्तसंस्था । येत्या ५ जानेवारीपासून श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येतोय. या दौऱ्यात भारत ३ टी-२० सामने खेळणार आहे. मात्र, ‘हिटमॅन’ रोहित शर्माला या मालिकेत विश्रांती दिली जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे २०२० वर्षाची सुरुवात भारतीय संघ कशी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघाने सरत्या वर्षाला विजयी संदेश दिला. टी-२० मालिकेनंतर भारताने एकदिवसीय मालिका २-१ने फरकाने जिंकली. रोहित शर्माने भारताकडून २०१९ हे वर्ष गाजवले असून विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने मालिकावीराचा किताब मिळवला. तथापि, २०२० वर्षातील पहिल्याच दौऱ्यादरम्यान विश्रांती घेत असल्याचे समजते.
निवड समिती सहसा टी-२० मालिकेत कोणाला विश्रांती देत नाही. मात्र रोहित गेले काही महिने सतत क्रिकेट खेळत आहे. त्याने बोर्डाला मला विश्रांती हवी असल्याचे कळवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत तो पुनरागमन करेल, बीसीसीआय मधील सुत्रांनी माहिती दिली.