अर्धे मुक्ताईनगर अंधारात : नागरिक संतप्त

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वादळी वार्‍यामुळे खांब कोसळल्याने अर्धे शहर काल सायंकाळपासून अंधारात असल्याने लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, काल सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. यामुळे मलकापूर रोडवर काही विद्युत खांबांवरील तारा खाली पडल्या. यामुळे वीज गायब झाली. तेव्हापासून ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत वीज आली नसल्याने मुक्ताईनगरकरांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत.

सध्या तापमानाचा पारा चढला असल्यामुळे नागरिक आधीच त्रस्त झालेले आहेत. यामुळे रात्रभर वीज नसल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. चांगदेव फिडरवरील अर्थात भुसावळ रोडकडचा भाग वगळता जुने शहर आणि बस स्थानकाच्या मागील बाजूच्या भागातील वीज बंद असल्यामुळे लोकांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान, या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने महावितरणचे सहायक अभियंता श्री. कुंभारे यांना संपर्क केला असता त्यांनी मलकापूर रोडवरील भागात वीज तारा जोडण्याचे काम सुरू असून सुमारे तासभरात वीज येईल अशी माहिती दिली आहे.

Protected Content