पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे सार्वजनीक कार्यक्रम रद्द; समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य

जळगाव प्रतिनिधी| कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली आहे. या बालकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभासह ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. तर जनतेचे प्रेम व आशीर्वाद हीच आपली ताकद असली तरी यंदा फक्त मोबाईल क्रमांकावरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनदेखील पालकमंत्र्यांनी केले आहे. दरम्यान, कोविडच्या आपत्तीमुळे ना. गुलाबराव पाटील यांनी ५ जून रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे घोषीत केले असून या दिवसाला जिल्हाभर फक्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर कार्यकर्त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या चाहत्यांनी भर दिला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा ५ जून रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त दरवर्षी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वाढदिवसाला पाळधी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या मैदानावर सायंकाळी जंगी सभा देखील होत असते. गेल्या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे ना. पाटील यांनी वाढदिवस साजरा केला नव्हता. तर यंदा देखील वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आजवर चाहते मोठ्या उत्साहात व चैतन्यदायी वातावरणात वाढदिवस साजरा करत असतात. यानिमित्त होणार्‍या सभेतून लोकांशी संवाद देखील साधता येतो. मात्र कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यात आले असून याचे पालन करत गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील आपण वाढदिवस साजरा करणार नाही. वाढदिवस पुढे देखील साजरे करता येतील. मात्र आजची प्राथमिकता ही कोरोनाग्रस्तांची सेवा आणि शासकीय नियमांचे पालन ही आहे. यामुळे आपल्या वाढदिवसाला कोणत्याही अभिष्टचिंतनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही. पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आपण फक्त फोनसह सोशल मीडियातूनच शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फक्त कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाभर आवश्यक त्या कार्यक्रमांना कार्यकर्त्यांनी व त्यांच्या प्रेमींनी भर दिला आहे.

दरम्यान, वाढदिवसाचे औचित्य साधून ना. गुलाबरावजी फाऊंडेशनने कोरोनामुळे अनाथ झालेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे अनाथ व निराधार झालेली मुले, विधवा झालेल्या महिला आदींना शासकीय योजनांच्या लाभासह ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

याच्या अंतर्गत जिल्ह्यात कोविडमुळे आई-वडील दोघांचा मृत्यू झाला अशा १८ वर्षाच्या आतील 9 मुलांची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे एक पालक गमावलेले १९१ मुले तर, विधवा झालेल्या १५३ महिलांची नावे शासकीय यंत्रणेकडे नोंद झालेली आहेत. यातील बालकांना शासनाच्या नियमानुसार मदत केली जाणार आहे. तर महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, नॅशनल फॅमिली पेन्शन स्कीम आदींच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. तर, २० अनाथ बालकांना ना. गुलाबरावजी फाऊंडेशनच्या मदतीने शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. यात त्यांना शैक्षणिक साहित्यासह शिक्षणाची जबाबदारी उचलण्यात येणार आहे. तसेच विधवा महिलांना शिलाई मशिनसह अन्य मदत करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गात समाजहित हे सर्वतोपरी मानणे आवश्यक आहे. या अनुषंगाने अनाथांचे पालकत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारली असल्याची माहिती फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेली आहे.

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाला संपूर्ण जिल्हाभरात समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोविडमुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असल्याने ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाला जिल्ह्यातील कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप फक्त मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून नंतर गरजू कलावंतांच्या घरी ही सामग्री पोहचवली जाणार आहे. कोरोनामुळे ऑक्सीजनची उपलब्धता हा सर्वात महत्वाचा घटक असल्याची बाब लक्षात घेऊन ऑक्सीजन बँक उभारण्यात येत आहे. यासाठी ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाला २० ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर रूग्णसेवेत सादर करण्यात येणार आहेत. तर याच दिवशी पाच व्हेंटीलेटरसह ५ ह्युमिडीफायर; २ बाय पॅप मशिन्स; १० मल्टी पॅरा पेशंट मॉनिटर; ५० पल्स ऑक्सीमीटर आणि १०० डिजीटल थर्मामीटर भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशनला देण्यात येणार आहेत.

पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात , मोहाडी येथिल महिला रुग्णालय परिसरात व चांदसर व इतर ठिकाणी पाचशे मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, आयुष्यमान भारत योजनांसह विविध जनाहिताची दाखले वाटपाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, जनतेचे प्रेम व आशीर्वाद हीच आपली ताकद असली तरी यंदा फक्त मोबाईल क्रमांकावरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनदेखील पालकमंत्र्यांनी केले आहे. यासाठी चाहत्यांनी ९३२५८७३३९९; ९७६४०३३६०१; ९९२३३५८८१४ आणि ९१५८०३३३२१ या क्रमांकांवर कॉल, व्हाटसअ‍ॅप मॅसेज अथवा एसएमएस करून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन देखील भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content