इंधन दरवाढ म्हणजे देशद्रोहच ! : स्वामींचे केंद्र सरकारला खडे बोल

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था | दररोज इंधनाच्या दरात होणारी वाढ म्हणजे देशद्रोह असून यामुळे देशात उठावासारखी स्थिती होऊ शकते अशा शब्दांमध्ये खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर देत हल्लाबोल केला आहे.

दररोज वाढणार्‍या पेट्रोल, डिझेल  आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज सकाळीच एक ट्विट करून केंद्र सरकारवर अतिशय कडवट टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की  रोज पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरांमध्ये होणार्‍या वाढीमुळं देशात उठाव निर्माण होण्याची परिस्थिती  तयार होत आहे. अर्थमंत्रालयामुळंच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अस स्वामी यांनी म्हटलं आहे. तसंच, अर्थमंत्रालयाच्या वैचारिक दारिद्रयामुळेच हे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच, हा देशद्रोह असल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अर्थसंकल्पातील तूट ही अशापद्धतीने दरवाढ करुन भरुन काढणे हे आर्थिक परिस्थिती हाळण्याची क्षमता नसल्याचं लक्षण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे अनेकदा आपल्याच सरकारवर टीका करत असतात. मात्र त्यांनी आज अतिशय जहाल भाषेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. यासोबत त्यांनी वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनाही लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे.

Protected Content