” क्रांतीपर्व ” मधून क्रांतिवीरांगणा लिलाताई आणि डॉ.उत्तमराव पाटलांचा धगधगत्या इतिहासावर चित्रपट येणार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या आंदोलनात देशातील सर्वात मोठे जळीत कांड घडवणारे क्रांतिकारक आणि भूमी अमळनेरची होती हा पडद्याआड राहिलेला इतिहास ” क्रांतीपर्व ” या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. क्रांतिवीरांगणा लिलाताई पाटील व डॉ उत्तमराव पाटील यांच्या जीवनपटावर प्रसिद्ध होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे हे करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक श्याम पाटील यांनी सांगितले.

संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी प्रतिपंढरपूर , सानेगुरुजींची कर्मभूमी , विप्रोचे मालक हशीमजी प्रेमजी यांची उद्योगभूमी , श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमी अशी ओळख असलेल्या अमळनेरची क्रांतीभूमी म्हणून असलेली ओळख पडद्याआडच राहिली होती १९४२ मध्ये महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर इंग्रज सरकारविरुद्ध चलेजावची चळवळ पेटली होती आणि साने गुरुजीं कारागृहात असल्याने त्यांनी डॉ उत्तमराव यांना पत्र लिहून सांगितले की सारा देश पेटला असताना उत्तम माझे अमळनेर शांत का ?

परंतु उत्तमराव देखील भूमिगत असल्याने त्यांनी आंदोलनाची धुरा आपली पत्नी लीलाताई यांच्यावर सोपवल्यामुळे लिलाताईनी ऐतिहासिक दगडी दरवाज्याबाहेर एका सभा घेत घणाघाती भाषण केले या सभेने अमळनेरच्या जनतेची मनेच नव्हे तर सरकारी इमारती – रेल्वे स्टेशन – पोस्ट ऑफिस – तहसील कचेरी – तहसीलदाराचा टांगा – न्यायालय सारेच पेटले क्रांतिवीरांगणा लिलाताईंच्या ललकारीने देशातील सर्वात मोठे जळीत कांड अमळनेर येथे त्यादिवशी झाले. इंग्रजांनी त्याकाळात अमळनेरला दीड लाखाचा दंड सुनावला होता. याचवेळी इंग्रजांनी त्यांना मारहाण देखील केली होती आणि त्यांच्या पोटावर इंग्रजांच्या बंदुकीचे ठोसे पडल्याने त्यांचा गर्भपात झाला होता त्यानंतर त्यांना पुणे येथील येरवाडा कारागृहात ठेवण्यात आले होते तेथून त्यानी पळून जाऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये सामील होत क्रांतीचे कार्य सुरू ठेवले होते.

चिमठाणे येथील खजिना लूट व इतर धगधगत्या घडामोडींवर हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिका , खाशाबा जाधव , सत्यशोधक यासारख्या चित्रपटांना योगदान देणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच पुणे येथील प्रसिद्ध झिवा स्टुडिओचे संचालक प्रज्ञेश मोळक यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट तयार करण्यात येईल अशी माहिती दिली येत्या ९ ऑगस्ट क्रांतिदिनापासून लिलाताईंच्या अमळनेर या क्रांतीभूमित चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ होणार आहे असेही श्याम पाटील यांनी सांगितले या चित्रपट व वेबसिरीजमुळे इतिहासाला उजाळा मिळणार असून नव्या पिढीला क्रांतीवीरांची आणि स्वातंत्र्याच्या संघर्षमय लढ्याची ओळख होणार आहे. यातून निश्चितच मुलांमध्ये , तरुणांमध्ये देशप्रेम , राष्ट्रभक्ती वाढून जनजागृती होण्यास मदत होईल.

Protected Content