मुंबई-लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बससेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत व्यवस्था केल्याची घोषणा केली आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, “गेली कित्येक वर्षे एसटी आणि एसटीचे कर्मचारी विठुरायाच्या भक्तांची सेवा सातत्याने करत आहेत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ते अतिशय निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून यंदा मी स्वखर्चाने सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करत आहे.”
या निमित्ताने माणसातील “विठुराया” ची सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे सांगत, हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही, त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. आषाढी वारीच्या काळात ५, ६ आणि ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक आणि पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.