चांद्रयान-२ मोहिमेचे परदेशी प्रसार माध्यमांकडून कौतुक

images 3

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेवर फक्त भारतीयांचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. ‘विक्रम’चे सॉफ्ट लँडिंग करण्यास अपयश आले असले तरी जगभरातील प्रमुख माध्यमांनी भारताच्या या अंतराळ मिशनची दखल घेतली आहे.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-२’ची मोहीम होती. याआधी कोणत्याच दे्शाची चांद्रमोहीम या ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळेच संपूर्ण जगाचे लक्ष या अंतराळ मोहिमेवर लागले होते. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी आणि गार्डियन यांच्यांसह अनेक प्रसारमाध्यमांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेची दखल घेतली.

 

चांद्रयान-२ हे भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे अमेरिकन मॅगझिन वायरने म्हटले. विक्रम लॅडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरवण्यास अपयश आल्यामुळे भारताला धक्का बसला आहे. मात्र, हे अपयश म्हणजे पराभव आहे, असे समजू नये असेही यात म्हटले आहे. भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि अनेक दशकांपासून विकसित होत असलेला अंतराळ कार्यक्रम यातून भारताची जागतिक स्तरावरील अंतराळ क्षेत्रातील महत्त्वकांक्षा अधिक प्रबळ असल्याचे दिसून येत असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. चांद्रयान-२ चे एक ऑरबीटर अजूनही चंद्राभोवती आहे. त्यामुळे ही मोहीम अंशत: अपयशी झाली असेच म्हणावे लागत असून चंद्रावर उतरणाऱ्या देशांच्या यादीत येण्यासाठी भारताला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचेही न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले.

ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने आपल्या लेखात इस्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारताच्या चांद्रयान-२ ला अपयश आले असले तरी भारतीय नागरिकांना याचे विशेष कौतुक वाटत असून राष्ट्राभिमानाची भावना उंचावली असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. सोशल मीडियावर भारतीय संशोधकांना मोठा पाठिंबा मिळाला असून अपयशातून संशोधक भरारी घेतील. या मोहिमेमुळे तरुणांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले. चांद्रयान-२ वर करण्यात आलेला खर्च हा अमेरिकेच्या अपोलो मिशनच्या खर्चाचा छोटा हिस्सा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

बीबीसीने चांद्रयान-२ मोहिमेवर झालेल्या खर्चावर टिप्पणी केली आहे. हॉलिवूड चित्रपट अॅव्हेंजर्स: एन्डगेम या चित्रपटाची निर्मिती चांद्रयान-२ मोहिमेपेक्षा अधिक खर्चिक असल्याचे नमूद केले आहे. मंगळायानावर कमी खर्च करण्यात आला होता, याकडेही बीबीसीने लक्ष वेधले. सीएनएमनेही चांद्रयान-२च्या उत्सुकतेबाबत नमूद केले आहे. भारतात रोव्हर चंद्रावर उतरताना येणाऱ्या छोट्या-छोट्या यशाचा आनंद साजरा करण्यात येत होता. मात्र, ‘विक्रम’शी संपर्क तुटल्यानंतर शांतता पसरली. भारताच्या ऐतिहासिक प्रयत्नाची सांगता अपयशाने झाली असल्याचे सीएनएनने म्हटले.

Protected Content