ठाण्यात दरड कोसळून पाच जण ठार

ठाणे | मुंबईत झालेल्या दरड दुर्घटनांनी उडालेली खळबळ शांत होत नाही तोच ठाण्यात आज दरड कोसळून पाच जणांना मृत्यू झाला आहे.

कळवा येथील घोलाई नगर परिसरात तीन घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. 

घोलाई नगर परिसरात चर्चच्या बाजूला असलेल्या तीन घरांवर सोमवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अचानक दरड कोसळली. याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. यावेळी टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या ढिगाऱ्याखालून दोन जणांना जिवंत बाहेर काढले. तर या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरांवर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशर झाला होता. चार घरांवर दरड कोसळल्याने ती घरं नेस्ताबूत झाली.

Protected Content