जळगाव (लाईव्ह ट्रेंड्स न्यूज चमूकडून) ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ’ या उक्तीला महत्व देत जळगाव जिल्ह्यातील चार तरुणांनी लोकशाहीतील कर्तव्याला महत्व दिले आहे. लगीनघाई असताना मतदानाचा हक्क बजावणाऱ्या जिल्ह्यातील या चार नवरदेवांनी समाजासमोर नवीन आदर्श घालून दिला आहे.
मतदान करून काय फरक पडणार आहे, असे अनेक जण म्हणतात. मात्र ‘मतदान करा, फरक पडतो, हे आजच्या तरुणाईने सिद्ध केले आहे. मुक्ताईनगर येथील दोन नवरदेव प्रशांत चिंचोले व अमोल सनान्से यांनी लग्नाच्या दिवशी घोड्यावर लग्नमंडपात जाण्याआधी संविधानाने दिलेला अधिकार वापरत मतदान केले. दुसरीकडे धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील राहुल अनिल नेमाडे या तरुणाने देखील वरमाला गळ्यात टाकण्याआधी मतदान केले. त्याचप्रकारे चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील गुरुदास अशोक पाटील या नवरदेवाने अंगावरील हळदीसह मतदानाचा हक्क बजावला.