चौकीदार चोर म्हणणे आले अंगलट ; राहुल गांधी यांना कोर्टाची अवमानना नोटीस

Rahul gandhi 1 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राफेल प्रकरणातील आदेशावर ‘चौकीदार चोर आहे, हे कोर्टानेही मान्य केले आहे’ असे वक्तव्य करणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. चुकीच्या पद्धतीने दोन गोष्टींचा संबंध जोडल्याची टिप्पणी करीत कोर्टाने राहुल यांना अवमानना नोटीस बजावली आहे.

 

भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी दाखल केलेली मानहानी याचिका रद्द करण्यात यावी, अशी विनंती राहुल गांधी यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ती फेटाळून लावली आहे. मीनाक्षी लेखी यांच्याद्वारे राहुल यांच्याविरोधात दाखल मानहानी याचिका आणि राफेल प्रकरणी निकालाविरोधात दाखल फेरविचार याचिकेवर ३० एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

सुनावणीदरम्यान मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडली. आपले वक्तव्य चुकीचे होते, हे राहुल यांनीही मान्य केले आहे. कोर्टाचे आदेश न पाहता उत्साहाच्या भरात विधान केल्याचे स्पष्टीकरण राहुल यांनी दिले आहे. त्यांनी एका ओळीतच खेद व्यक्त केला आहे. त्यांचे दिलगिरी व्यक्त करणे, हा केवळ दिखावा आहे, असेही रोहतगी यावेळी म्हणाले. चौकीदार कोण आहे ? अशी विचारणाही कोर्टाने केली. त्यावर राहुल यांनी अमेठीपासून वायनाडपर्यंत कोर्टाने चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचा प्रचार केला आहे आणि चौकीदार नरेंद्र मोदी आहेत. एका राष्ट्रीय पक्षाचे नेते सुप्रीम कोर्टासोबत कशाप्रकारे व्यवहार करत आहेत हे बघायला हवे, असेही रोहतगी म्हणाले.

कोर्टाच्या हवाल्याने ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत आहे, असे राहुल गांधी यांच्या वतीने त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणीवेळी सांगितले. राहुल नम्र आणि प्रामाणिक आहेत, त्यांनी झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि याचिका रद्द करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी हे ‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर ठाम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट यावेळी केले.

Add Comment

Protected Content