पाल येथे जेवणावरून बापाचा खून; मुलाला अटक

रावेर प्रतिनिधी । जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात खाटेच्या माचल्याचा दांडका डोक्यात मारून खुन केल्याची घटना सोमवारी (ता.२९) सायंकाळी पाल (ता.रावेर) येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीसांनी संशयितास अटक केली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील पाल येथे गट शेत शिवार गट नंबर २७१ शेतात अनाज्या भारत्या बारेला (वय ७५) हा रहात होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी त्यांचा मुलगा दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला (वय २६) यास जेवण करून घेण्यास सांगितले. यावेळी दिनेशने काय केले आहे असे विचारले असता त्याच्या वडीलांनी उडीद दाळ व भाकरी केल्याचे सांगितले. उडीद दाळ व भाकरी केल्‍याचा राग येऊन दिनेशने वडील व बहीणीस चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्याचे वडील तेथून पळून जात असतांना दिनेश याने लाकडी खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने वडील अनाज्या बारेला यांच्या तोंडावर व डोक्यावर तडाखा मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले. याबाबत बनाबाई नरसिंग बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन नवले व पोलीस करीत आहेत.

 

Protected Content