मुंबई वृत्तसंस्था । शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी असून तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सोलापूरातील शिवसैनिकांनी केली असून थेट मुंबई गाठली. यामुळे सावंत यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी जिल्हा पातळीवरील राजकारणात पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने शिवसेनेत सावंत यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये सावंतांविरोधात संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे सावंत यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणारे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता तानाजी सावंत यांच्यावरही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये घडलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आता या बैठकीला तानाजी सावंत उपस्थित राहणार का? याकडे लक्ष असणार आहे.