ठरलं : २६ मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार !

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएलचा थरार यंदा २६ मार्चपासून रंगणार असून यातील बहुतांश सामने हे मुंबई आणि पुण्यात होणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चं बिगूल वाजलंय. यंदाच्या आयपीएल सत्राला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची  बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या सत्रातील आयपीएल मॅचला येत्या २६ मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी जगासह भारतावर कोरोनाचे संकट होते. भारतात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. त्यामुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर झाले होते. मात्र यंदा सर्व सामने भारतातच होणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन सामने आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलचे बुहुता:श सामने हे पुणे आणि मुंबईतच खेळवले जाणार आहेत.

यातील आयपीएलचे ५५ सामने हे मुंबईत तर १५ सामने पुण्यात खेळवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामन्यांपैकी २० सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, २० सामने डीवाय पाटील स्टेडियमवर तर सीसीआयमध्ये १५ सामने होणार आहेत. तर पुण्यात १५ सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काउंसीलच्या वतीने देण्यात आली आहे. यंदा अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन नवीन संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रात नियम शिथील होण्याची शक्यता असल्याने सरकारने ठरवून दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामने पाहता येणार आहेत.

 

Protected Content