जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावमध्ये सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज (१ मे) या पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
हे सायबर पोलीस स्टेशन २४x७ कार्यरत राहणार असून, सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. डिजिटल युगातील सायबर सुरक्षा ही काळाची गरज असून, नागरिकांनी सजग राहून या सेवांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायबर गुन्ह्यांचे स्वरूप आणि त्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.